चंद्रपूर, दि. 11(जिमाका) : जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत 40 अंशपार तापमान गेले असून येणा-या काही दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने उष्माघाताच्या लाटेपासून आपले व कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
उष्ण लाटेमध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी, त्याबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करावी. शाळा, महाविद्यालये, गर्दीचे ठिकाण आदी ठिकाणी नियमितपणे नागरिकांना याबाबत अवगत करावे. तसेच लहान मुले, वयोवृध्द नागरिक यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या उन्हात कुणीही बाहेर जाण्याचे शक्यतो टाळावे. तसेच प्रशासनामार्फत येणा-या सुचनांचे पालन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.
नागरिकांनी उष्ण लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता :
काय करावे :
१) पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा.
२)घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. ३) दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडद्यांचा वापर करावा.
४) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
५) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
काय करू नये :
१) उन्हात अतिकष्टाची कामे करु नये.
२) दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.
३) दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
४) उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
५) लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
६) गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
७) बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
८) उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे,
९) तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
१०) चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.
००००००