सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वैशाली बुद्दलवार यांचे आ.मुनगंटीवाराना निवेदन
सुरेश रंगारी (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)
पत्रकार / कोठारी, दि. ०५ :बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरातील विजेच्या लपंडावामुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सततच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहेत. या प्रकारावर आळा घालण्यासाठी व वीज पुरवठा नियमित करण्यासाठी माजी जिल्ह्या परिषद सदस्य वैशाली बुद्दलवार यांनी थेट आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत तातडीने समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
सद्या पावसाळा सुरू असून वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित होत असतो.सुरळीत वीज पुरवठा करण्याकरिता महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. शेतीसाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर मिळत नसल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. यामुळे पीक संकटात सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक वीज सतत गायब असल्यामुळे त्यांचे शिक्षण अडचणीत येत आहे.

विजेच्या कमीजास्त दाबाने घरातील उपकरणे निकामी होत आहेत.गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत अनेक वेळा तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही. विजेची वेळ ठरलेली नसून अचानक वीज गायब होते आणि अनेक वेळा तासन् तास पुरवठा खंडित राहतो.
परिसरातील गावात रात्री-अपरात्र वीज जाते मात्र परत केव्हा येईल याचा काही नेम नाही. यामुळे लहान मुले, वृद्ध, आणि शेतकरी सगळेच त्रस्त आहेत. या समस्येचा तातडीने निपटारा करण्यात यावा, नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करावा आणि महावितरणच्या ढिसाळ कारभारावर लगाम घालावा, अशी जोरदार मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली बद्दलवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
“कोठारी येथे वीज वितरण कंपनीचे शाखा कार्यालय व ३३ के.व्ही.असून येथील अभियंता नियमित वीज पुरवठा करण्यासाठी दुर्लक्ष करीत असतात.याबाबत त्यांना अवगत करूनही त्याकडे कानाडोळा करून गावकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम होत आहे.त्यामुळे गावकरी त्रस्त असून बेलगाम अधिकाऱ्यावर लगाम लावणे आवश्यक आहे व नियमित सुरळीत अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी लक्ष केंद्रित करावे.
— वैशाली बुद्दलवार,माजी जि. प.सदस्य
