संदीप मावलीकर (संपादक / इंडियन दस्तक न्यूज)
पत्रकार / अमरावती, दि. 7 : राज्यात फलोत्पादन पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. या अनुषंगाने, कृषी समृद्धी योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळपीक लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यात ड्रॅगनफ्रुटला 2 लाख 70 हजार रूपये प्रती हेक्टर, स्ट्रॉबेरीला 80 हजार प्रती हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. फुलपीक लागवडीत दांड्याची फुलेला 50 हजार प्रती हेक्टर, कंदवर्गीय फुलेला 1 लाख प्रती हेक्टर, सुटी फुलेला 20 हजार रूपये प्रती हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे.

मसाला पिके लागवडीत मिरचीला 20 हजार रूपये प्रती हेक्टर, आले, हळदला 80 हजार रूपये प्रती हेक्टर, औषधी व सुगंधी वनस्पतीला 60 हजार रूपये प्रती हेक्टर, संत्रा फळबाग पुनरुज्जीवनला 24 हजार रूपये प्रती हेक्टर अनुदान देण्यात येते. सामूहिक शेततळेला खर्च मापदंडाच्या 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, अळींबी उत्पादन प्रकल्प, हरितगृह व शेडनेट गृह, प्लास्टिक मल्चिंग, पॅकहाउस व कांदाचाळ यांना खर्च मापदंडाच्या 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. संकलन एकत्रीकरण केंद्र, पूर्व-शितकरण गृह व फिरते पूर्व-शितकरण गृह, शितखोली व सौरऊर्जा शितखोली, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, एकात्मिक शितसाखळी प्रकल्पांना खर्च मापदंडाच्या 35 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबिटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
00000
